Monday, February 2, 2009

पब संस्कृती रुजू देणे योग्य नाही

"पब' ही काही आमची संस्कृती नाही, म्हणून आम्ही तिला कर्नाटकात अजिबात थारा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी घेतली आहे. त्याचबरोबर "श्रीराम सेना' या संघटनेवर बंदी घालणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मंगळूर येथील पबमध्ये "श्रीराम सेने'च्या कार्यकर्त्यांनी महिलांना मारहाण केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले, ""पब ही आमची संस्कृती नाही. ती अत्यंत चुकीची आहे. तिला अजिबात परवानगी देता कामा नये. कर्नाटकात आम्ही त्यास अजिबात थारा देणार नाही.''पबमधील महिलांवर झालेल्या हल्ल्याबाबत ते म्हणाले, ""महिलांवर असे हल्ले करण्याचीही आमची संस्कृती नाही. म्हणून मारहाणप्रकरणी आतापर्यंत ३३ जणांना अटक केली आहे. आवश्‍यकता वाटल्यास "गुंडा कायद्यान्वये' कारवाई करू. अर्थात, संघटनेवर बंदी घालण्याचा प्रश्‍नच नाही. त्याने प्रश्‍न सुटणार नाही. मंगळूरचा प्रकार स्थानिक आहे. त्यावरून कर्नाटक सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे. माझ्या सरकारची लोकप्रियता विरोधकांच्या डोळ्यांत खुपत आहे. ''दरम्यान, हिंदुत्वाच्या आधारेच भाजपला सत्ता मिळाली आहे, हे येडियुरप्पा सरकारने लक्षात ठेवावे. सरकार वाचविण्यासाठी हिंदू संघटनांचा बळी देण्याची चूक करू नका. तसे केले तर कर्नाटकातही तुमची अवस्था उत्तर प्रदेशप्रमाणे होईल, असा इशारा "श्रीराम सेने'चे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे. गेहलोत यांची सारवासारवराजस्थानात पब संस्कृती रुजू देणार नाही, असे सांगणारे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी सारवासारव केली. ते म्हणाले, ""माझ्या मताचा मंगळूर घटनेशी संबंध नाही. महिलांना झालेल्या मारहाणीचे समर्थन नाही; मात्र पब सं स्कृती आणि मॉलमध्ये मुले-मुलींनी हातात हात घालून फिरण्याची संस्कृती राजस्थानच्या हिताची नाही, असे माझे मत आहे.'' दुसरीकडे, मुले-मुली एकत्र फिरण्यामध्ये काय चुकीचे आहे, असा सवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दी क्षित यांनी केला आहे.

हॉकीचे पुनर्जीवन

गतवर्ष भारतीय संघ ऑलिंपिकसाठी अपात्र ठरल्यामुळे हॉकी जगतात गाजले. आता हे अपयश धुवून काढण्यासाठी भारताने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याची चाचणीच जणू उद्यापासून सुरू होणाऱ्या पंजाब सुवर्णचषक चौरंगी हॉकी स्पर्धेत होईल. सेक्‍टर 42 स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेत भारताची सलामीची लढत न्यूझीलंडविरुद्ध होईल. या लढतीद्वारे स्पर्धेत विजयी सलामी देण्याचे भारताचे लक्ष्य आहे.भारताने आंतरराष्ट्रीय हॉकीत जवळपास वर्षभराने पुनरागमन करताना गेल्याच महिन्यात अर्जेंटिनाविरुद्धची मालिका खेळली. बीजिंग ऑलिंपिक विजेते जर्मनी, युरोपियन विजेते हॉलंड; तसेच कायम धोकादायक ठरू शकणारे न्यूझीलंड यांच्याविरुद्ध भारताची लढत होईल. प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अर्जेंटिनातील पहिल्या दोन कसोटी जिंकल्या; पण त्यानंतरच्या दोन गमावल्या. संदीप सिंग व त्याच्या सहकाऱ्यांना या स्पर्धेत गाफील राहून चालणार नाही. तिन्ही प्रतिस्पर्ध्यांची भारताच्या माफक चुकांचाही पुरेपूर फायदा घेण्याची क्षमता आहे. अर्थात त्यावेळी संघात पुनरागमन केलेल्या अर्जुन हलाप्पा व इग्नेस तिर्कीच्या अनुभवाचा फायदा होईल, अशी भारतीयांची अपेक्षा आहे. ""पंजाब सुवर्णचषक जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा नक्कीच लाभेल. प्रोत्साहित करणाऱ्या प्रेक्षकांना विजयाची भेट देण्याचे आमचे लक्ष्य आहे,'' असे संदीपने सांगितले. दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेबाबत चंडीगडमध्ये चांगलेच औत्सुक्‍य आहे. या स्पर्धेसाठी पंजाबच्या ग्रामीण भागात हॉकीचे धडे गिरवत असलेल्या नवोदित हॉकीपटूंना आणण्याचा पंजाब क्रीडा खात्याचा इरादा आहे. अर्थात प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत पंजाब या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. या स्पर्धेचे सुरुवातीस इएसपीएनवरून प्रक्षेपण होणार होते; पण स्पर्धेसाठी साठ लाखांचे पुरस्कर्ते मिळविण्यात संयोजक अपयशी ठरले व अखेर दूरदर्शनला स्पर्धा प्रक्षेपणाचे अधिकार देण्यात आले.

सातपुड्यातील वृक्षतोडीमुळे पर्यवार्नावर

तलोदा तालुक्‍यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगत वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास होत आहे. वन विभागाने वृक्षतोडीविरुद्ध कडक मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. त्या दृष्टीने वन विभागासह विविध यंत्रणांकडून जनजागृतीसाठी सकारात्मक प्रयत्न होण्याची गरज आहे. सातपुडा पर्वतरांगांत तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात जंगल होते. मात्र वनजमिनीवर अतिक्रमण, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदी कामांसाठी जंगलाचा वापर केला जात आहे. त्यामुळे जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. तालुक्‍यातील कोठार, अमोणी, राणीपूर, वाल्हेरी या भागांत काही प्रमाणात जंगल शिल्लक होते. मात्र काही वर्षांपासून सर्रास सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे ही वनसंपदा धोक्‍यात आली आहे.ही वृक्षतोड सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. फक्त जंगलातीलच वृक्षांची कत्तल होत आहे, असे नाही तर सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून तालुक्‍यात रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या वृक्षांचीही तोड सुरू झाली आहे. त्यामुळे हा परिसर उजाड होऊ लागला आहे. यात गुंतलेले काही संशयित फायद्यासाठी रात्रीच वृक्षतोड करून लाकूड परराज्यांत रवाना करीत असल्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. वृक्षतोडीच्या वाढलेल्या प्रकारामुळे निसर्गाच्या प्रकोपाला सर्वांना सामोरे जावे लागत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्‍त होत आहे.वृक्ष लागवडीची गरजवाढलेल्या वृक्षतोडीमुळे परिसर उजाड होऊ लागला आहे. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता अधिकाधिक वृक्ष लावण्याची व त्यांचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तळोदा- अक्‍कलकुवा मतदार संघाचे विद्यमान आमदार पद्माकर वळवी काही वर्षांपासून अधिकाधिक वृक्षलागवडीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या माध्यमातून तालुक्‍यातील दुर्गम, अतिदुर्गम गावांपर्यंत विविध वृक्षांची रोपे लावण्यात येऊन त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत आहेत. यामुळे काही अंशी का असेना सातपुड्यातील झालेल्या वृक्षतोडीची भर होताना दिसून येत आहे.कारवाईची गरजवृक्ष तोडून जंगल नष्ट करणाऱ्यांविरुद्ध वन विभागाने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढलेली वृक्षतोड पाहता वन विभागाने गस्त वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे वृक्षतोडीला काहीसा आळा बसेल. एकीकडे शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत व अन्य संस्थांद्वारे झाडे जगवा देश वाचवा असा नारा देऊन वृक्षारोपण केले जात आहे. दुसरीकडे सर्रासपणे वृक्षतोड सुरू असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे वन विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. वन विभागाने याविषयी दखल घेणे आवश्‍यक असल्याच्या प्रतिक्रिया वृक्षप्रेमींसह सर्वसामान्यांतून उमटत आहेत.

झोपडपट्टी विकासाचा सुधारित दर एक लाख

एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्‌टी विकास कार्यक्रमांतर्गत बांधण्यात येणाऱ्या निवासी संकुलांसाठी 80 हजार ते एक लाख रुपये या सुधारित दराला आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने मान्यता दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील झोपडपट्टीवासीय सुखावले आहेत. छोट्या आणि मध्यम शहरांसाठी राबविण्यात येत असलेल्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत छोटी घरे आणि झोपडपट्ट्यांचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी सुधारित दर मंजूर झाल्याने झोपडपट्टीवासीयांना दिलासा मिळणार आहे.

पोलाद कंपन्यांवरही मंदीचे सावट

जागतिक मंदीमुळे मोठ्या पोलाद उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावरही यंदा परिणाम झाला आहे. टाटा समूहाच्या "टाटा स्टील'चा नफा सुमारे ५६ टक्‍क्‍यांनी घटला असून, सज्जन जिंदाल प्रमुख असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीलाही सुमारे १२७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. नाल्को कंपनीने मागणीअभावी उत्पादन कपातीचा निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.जागतिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर मागणी कमी झाल्याने अनेक कंपन्यांना आपले उत्पादन कमी करावे लागले होते. त्याचा फटका चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत बसल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे. "टाटा स्टील'नेही पश्‍चिम बंगालमधील आपला निर्मिती प्रकल्प काही दिवस बंद ठेवला होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ५६.३७ टक्‍क्‍यांनी घसरून तो ४६६ कोटी २४ लाख रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत हा नफा सुमारे १ हजार ६८ कोटी रुपये होता. कंपनीचे उत्पन्नही चार टक्‍क्‍यांनी घसरले असून, यंदा ते ४८१० कोटी रुपये आहे. कंपनीची निर्यातही घसरून ४०४ कोटी रुपयांची झाली आहे. कंपनीचे पोलाद उत्पादन गेल्या कालावधीच्या सव्वा लाख टनाच्या तुलनेत यंदा १.२३ लाख टन झाले आहे.जिंदाल समूहातील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत सुमारे १२७ कोटी ५० लाख रुपयांचा तोटा सहन केला आहे. नऊ महिन्यांतील करोत्तर नफाही सुमारे ७० टक्‍क्‍यांनी घसरला आहे. याच नऊ महिन्यांत कंपनीचे एकूण उत्पन्न ३५ टक्‍क्‍यांनी वाढून ते १० हजार ८२९ कोटी रुपये झाले आहे.नाल्को या ऍल्युमिनिअम उत्पादक कंपनीचाही नफा डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ३३ टक्‍क्‍यांनी घसरला आहे. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत २२० कोटी रुपयांचा नफा झाला. तत्पूर्वी याच कालावधीत हा नफा ३२९ कोटी रुपये इतका होता. कंपनीचे एकूण उत्पन्नही यंदा ७.८ टक्‍क्‍यांनी कमी झाले असून, ते ११४९ कोटी रुपये झाले आहे. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सी. आर. प्रधान यांनी सांगितले, की कंपनी मार्चपर्यंत उत्पादनकपात कायम ठेवेल.